Monday, September 13, 2010

मराठी भाषीकांसाठी

हनुमानाचा शाप व त्यावर उतारा – भाग २




माणसाचा स्वभाव हा जात्याच ‘पोझेसीव’ असतो. म्हणजे हे माझे, हे मी मिळवले आहे, माझी गोष्ट अशी असावी, मी मग असे करीन – अशी वाक्ये आपण नेहमी ऐकतो ते हेच दर्शवतात. मग भारतात राहणा-या हिंदु मनाला ह्या गोष्टीची जाणीव निर्माण करुन दिली पाहीजे की ही जी महान संस्कृती म्हणजेच विचारसरणी त्याला लाभली आहे ती त्याची स्वतःची आहे. ती त्याच्या पुर्वजांनी स्वतः संपादन केली आहे. ती त्याच्या साठीच, आयुष्य सुकर करणारी व प्रेरणादायी विचारसरणी आहे. ह्याच विचारसरणीने आज ह्या देशाला इतर देशांपेक्षा वेगळे केले आहे. ह्याच विचारसरणीने, सगळ्या भारतियांना विचार बंधांनी बांधलेले आहे. ह्या विचारसरणीत एवढी शक्ती आहे की तिचा जर अवलंब केला तर, लोकांचे कल्याण होईल ह्याचा प्रत्यय आज हजारो वर्षे आपल्याला येत आलेला आहे.



आज भारतात अनेक वेगवेगळे रितिरीवाज आहेत – उत्तरे कडुन दक्षिणे पर्यंत व पुर्वे कडुन पश्चिमे पर्यंत. पण प्रत्येकाला माहीत आहे की आपण वेगळे नाहीत. कारण मनाच्या कोप-यात वा अंतर मनात दडलेले असते की आपली विचारसरणी म्हणजेच धर्म एक आहे, व हा एवढा एक व एकच दुवा पुरा आहे लोकांची मनं बांधून ठेवायला. पहा ही कल्पना नुसती मनाच्या कोप-यात असल्यानीच केवढे कार्य केले आहे, त्याचीच जर प्रत्येकाला जाणीव झाली तर त्यातूनच केवढी मोठी सांघीक शक्ती निर्माण होईल. हीच शक्ती प्ररणा देते की आम्ही एक आहोत. हा देश आमचा आहे. ही विचारसरणी टिकवण्यास व प्रगल्भ करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. आम्हाला आमच्या विचारसरणीचा म्हणजेच हिंदुत्त्वाचा अभीमान आहे. हे आमचे आहे. आमच्या देशाला काही अपयश आले तर नामुष्की आमची स्वतःची होणार आहे. देश यशस्वी झाला तर यश माझे आहे. माझा भारत बलाढ्य झाला पाहीजे, कारण माझी विचारसरणी, माझी संस्कृती, माझी इच्छा प्रबळ आहे. हजारो वर्षांच्या परंपरेतून तावून सुलाखून निघालेली आहे. विचारसरणी पक्की आहे, खोटी आमच्या कडुनच आहे. पण हे सगळे आपल्या विचार धारणेवर विश्वास नसला तर मुळीच होणार नाही. म्हणूनच प्रत्येक हिंदु मनाला आपण हिंदु आहोत ह्याचा आभिमान पाहीजे व तो योग्य त-हेने प्रगट करता आला पाहीजे हे महत्वाचे. हिंदु धर्माचा अभिमान बाळगणे व तो योग्य त-हेने प्रगट जर करायचा तर आपल्याला खालील सुत्र अंमलात आणावी लागतील. ती सुत्र अशी आहेत.



- आपल्या व आपल्या भोवतालच्या लहान मुलांना योग्य वळण लावणे व जागृत करणे, राष्ट्रव्रती बनवणे.

- अहंभाव कमी करणे.

- राष्ट्र सुधार कार्यात नेहमी अग्रेसर राहणे.

- लाचखोरी व वित्तिय घोटाळ्यां पासुन स्वतः दुर रहाणे व दुस-याला परावृत्त करणे.

- आपल्यातले कला, नैपुण्य सतत वाढवणे व छंद जोपासाणे. शरीराला व्यायामाची सवय ठेवणे.

- कामाच्या चागल्या सवयी लावुन घेणे. तसेच कोणच्या ही कामाची व काम करणा-यांची उपेक्षा टाळणे.

- नितीमत्ता व चांगल्या आचारणांचा वापर सतत करणे.

- टोकाच्या आवडी-निवडी टाळणे. छांदीष्टपणा टाळणे व स्वतः बद्दलची कीव कमी करणे.

- दुरदर्शी बनायचा प्रयत्न करा व स्वतःचे विचार उत्तम, उदात्त व उत्तुंग बनवा.

- आपल्या धर्मातल्या चागल्या नियमांचे पालन काटेकोरपणे करणे.



ही सुत्र जो अमलात आणतो तो हिंदु हा राष्ट्रव्रती असतो. ही सुत्रे आपल्या हिंदुधर्मात वेळोवेळी व वेगवेगळ्या संतांनी, स्मृती, श्रुतीं मधुन निर्देशांच्या रुपाने आधिच अस्तित्वात आहेत. येथे फक्त देश काल पात्राच्या मर्यादेत राहुन एकत्र केली आहेत. हेच हिंदुत्त्व, हेच राष्ट्रव्रत. राष्ट्रव्रताच्या दहा सुत्रांचे आकलन होण्या करता ती सुत्र काय आहेत ती पाहूया.



- आपल्या व आपल्या भोवतालच्या लहान मुलांना योग्य वळण लावणे व जागृत करणे, राष्ट्रव्रती बनवणे. हे प्रत्येक हिंदुत्त्ववाद्याचे म्हणजेच राष्ट्रव्रत्याचे कर्तव्य असले पाहीजे. आपल्या राष्ट्राला अग्रेसर बनवणारी अशी लहान मुलेच मशाली ठरणार आहेत. त्याना हिंदु असण्याची कल्पना व देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी लागणारी विचारांची योग्य सामुग्री त्यांच्या बालपणीच बालकडु म्हणुन द्यायला हवी. हे साध्य करण्यासाठी काही रुपरेषा दिल्या आहेत –



• लहान मुलांना कामाचे मह्त्व शिकवावे. कोणचे ही काम खालच्या दर्जाचे नसते. काम करणा-यांची उपेक्षा करणे घातक असते. त्यांच्या मनात ठसवा की ज्याना काम मिळाले आहे ते खरोखरीच नशीबवान आहेत.

• त्यांच्यात स्वछतेची जाणीव जागवा. स्वतःची स्वछता व सार्वजनिक स्वछतेचे मह्त्व रुजवा. सार्वजनिक स्थळे घाण करणे म्हणजे अतिशय निचतेचे वागणे आहे हे पटवा.

• वहानांचे योग्य नियम शिकवा व ते पाळायला शिकवा.

• मुलांना रांगेत उभे राहण्याचे मह्त्व बिंबवा. आपल्या देशाचे नियम पाळायची सवय लावा. नियम पाळणे वा न पाळणे हे कोणी बघताय वा बघत नाही ह्या वर अवलंबून असायला नको. नियमां विरुद्ध अर्ज करणे व नियम का पाळला नाही त्याला कारणे देणे आपल्यात भिनले आहे ते थांबवायची गरज आहे. लहानांना हे पटवले पाहीजे की नियम न पाळणे ह्यात काही शहाणपण नाही. माणसाचे थोरपण तेव्हाच कळते जेव्हा तो नियम पाळुन यशस्वी होतो.

• लहानांना व्यायामाचे मह्त्व शिकवा. सुर्यनमस्कार शिकवा. निटनेटकेपणा अंगी बाणायला शिकवा. कोणचीही गोष्ट चांगल्या त-हेने सादर करायची कला आत्मसात करायची सवय लावा.

• आपल्या देशाच्या मालमत्ते चे रक्षण करायची सवय लावा. विरोध जरी प्रदर्षित करायचा झाला तरी वहाने जाळुन व कोणच्याही प्रकारची नासधुस करुन प्रदर्षित करता कामा नये ह्याची शिकवण लहालपणापासुन द्या.

• थुंकायची सवय चांगली नाही हे मनात बिंबवा.

• छोट्या छोट्या गोष्टीत आनंद घ्यायला शिकवा. टोकाच्या आवडी निवडी सोडायला शिकवा. त्यानी त्यांचे पुढचे आयुष्य आनंदी व प्रसन्न होण्यास मदत होईल.

• सकाळी लवकर उठण्याचे मह्त्व शिकवा. जो सकाळी लवकर उठतो त्याला दुस-यां पेक्षा जास्त वेळ मिळतो.

• लहान मुलांन मध्ये मिसळा. त्यांच्या बरोबर संध्याकाळी खेळ खेळा. जर लहान वयात मुलांना नुसते मोकळे सोडले तर मुलं वाईट सवयी पटकन धरतात. नाहीतर गणकयंत्रावर लहानपणीच विविध हानीकारक खेळ खेळायचा वाईट नाद लागतो मुलांना. त्यामुळे त्यांची मनोवृत्ती विकृत बनु शकते वा शारिरीक प्रगती खुंटते. जर का आसपास खेळायचे मैदान नसेल तर त्यांच्याकडुन पळायचा व्यायाम करवुन घ्या. सुर्यनमस्कारांचे मह्त्व पटवुनद्या व त्यांच्या कडुन सुर्यनमस्कार घालुन घ्या.

o लहान मुलांमध्ये कसे मिसळायचे व त्यांना जागृत कसे करायचे ह्याचे थोडक्यात वर्णन करत आहे.

 साधारणपणे दररोज १ तास लहानांना मध्ये घालवायचा प्रयत्न करावा. लहानात मिसळा तुम्हीही आनंदी बनाल. तुमच्या आवडी नुसार व वेळेच्या उपलब्धते नुसार वेळापत्रक करावे. पण जे ठरवाल त्यात नियमीतता असली पाहीजे.

 पहीला अर्धा तास व्हॉली बॉल, फुट बॉल सारखे मैदानी खेळ असावेत. ह्या खेळांनी एकमेकांमधले सामंजस्य वाढते, मुलांची शारिरीक प्रगती होते आणि दमायला होते. लहान मुलांनी खेळ खेळुन दमायलाच पाहीजे. पुढची १५ मिनीटे, त्याना एखादी गोष्ट सांगा. ही गोष्ट अशी निवडा कि ज्या पासुन जिवनाबद्दल चांगले धडे शिकायला मिळतील. ती गोष्ट, पुर्वीच्या आपल्या भारतवर्षाच्या उज्वल काळातली असु शकते, आपल्या इतिहासातल्या झालेल्या चुका असु शकतात, आपल्या स्वातंत्र्य लढ्या बद्दलच्या गोष्टी असु शकतात, किंवा एखादी आपल्या स्वातंत्र्योत्तर काळातील भारत पाक लढ्यातली गोष्ट असु शकते. किंवा एखाद्या थोर लेखकाने लिहीलेली गोष्टही असु शकते.

 पुढची १५ मिनीटे मुलांना हल्लीच्या ज्वलंत प्रश्नांबद्दलची माहीती करुन द्यावी. त्यांना त्याचा विचार करुन त्या प्रश्नांवर उत्तरे शोधायची सवय लावावी. लोकांपुढे बोलायची सवय लावावी. सभे पुढे बोलायचे धैर्य वाढवावे.

 हा एक तास तुम्ही जेवढा नीट आखाल तेवढा त्याचा फायदा मुलांच्यात योग्य जागृती होण्यात होईल. मुलांमध्ये तुमचा मेळ बरोबर बसला पाहीजे तरच मुले तुम्हाला मित्र समजुन, किवा तुमचा आदर करुन चांगल्या सवयी उचलतील.



हे करताना आपल्याला स्वतःचा अहंभाव जरा बाजुला ठेवावा लागेल. मुलांना शिकवायची मनापासुन इच्छा व्हायला पाहीजे. कोठे मुले चुकताना दिसली तर, मला काय करायचे त्यांचे पालक बघुन घेतील ही भावना सोडुन देऊल मुलांची चुक दुरुस्त करायचा प्रयत्न करावा लागेल. मुलांना चुक समजावुन द्यावी लागेल व पालकांनीही उगाचच मुलांची बाजु घेण्याचे टाळले पाहीजे. हातुन झालेल्या चुकांचा मुलांना पश्चाताप होणे हे चांगले लक्षण आहे ते जोपासले पाहीजे. ज्याला पश्चाताप होतो तो चुका सुधारु शकतो.



- अहंभाव कमी करणे. ब-याच वेळेला आपला अहंभाव कृती करण्याच्या आड येतो. आपल्यातल्या अहंभावामुळे ब-याचवळेला कृती कराविशी वाटुन सुद्धा गोंधळ उडण्या सारखे भरपुर प्रश्न आपल्या समोर उभे ठाकतात. कधी वाटते – माझा दर्जा, माझी ‘पोझीशन’ पाहुन मी का म्हणुन असले काम करु? कधी मनात येते, मी कशाला त्या मुलाला शिकवू किंवा चुका काढु? – कारण, तो मुलगा ज्या घरातला आहे त्याच्याशी आपले फार काही जिव्हाळ्याचे संबंध नाहीत. कधी कोणी आपल्या राष्ट्रासाठी छान कल्पना पुढे ठेवली तर मी मदत तर सोडाच पण साधा पाठींबा पण देणार नाही. बाजुला होऊन गंम्मत बघेन. फारच झाले तर, मला जर श्रेय मिळणार असेल तर मग विचार करीन. आपण जेव्हा आपल्याकडे कामकरणा-यांच्या मुलांना शिकवत असु, किंवा एखाद्द्या दारिद्र्यरेषे खालच्या घरातल्या मुलांना शिकवत असु तेव्हातर प्रामुख्याने आपल्या अहंभावावर नियंत्रण ठेवायला शिकले पाहीजे.



- राष्ट्र सुधार कार्यात नेहमी अग्रेसर राहणे. राष्ट्र जो पर्यंत समृद्ध होत नाही तो पर्यंत स्वतःचा व स्वतःच्या कुटूंबाचा सातत्त्याने विकास होणार नाही. हे ज्याला पटले तो आपोआपच राष्ट्र सुधार कार्यात अग्रेसर होईल. आपण स्वतःचा विकास जेव्हा आपले राष्ट्र निकोप, सुरक्षित व संघटीत होईल तेव्हाच ख-या अर्थाने करु शकु. आपल्या धर्मा मध्ये गरजुंची मदत नहमीच प्रतिपादीली आहे एवढेच नाही तर शास्त्रांमध्ये ती कशी करावी ह्यावर मार्मीक विवेचन आढळेल. शास्त्रे सांगतात, आपल्या मिळकतितील १० टक्के आपण गरजुंना द्यावेत, १० टक्के आपल्या वृद्ध पालकांवर व थोरांवर खर्चि घालावी, १० टक्के भविष्यासाठी साठवुन ठेवावी आणि बाकी उरलेली स्वतःवर व परिवाराच्या कल्याणार्थ खर्ची घालावी. ही काही काळ्या दगडावरची रेघ नव्हे – पण एक घालुन दिलेला पायंडा आहे. कोणाला गरजे नुसार, इच्छे नुसार, आपल्या शक्ति नुसार, आपल्या आत्म्याच्या प्रगल्भतेच्या स्तरानुसार, आपल्या आवडी नुसार त्या प्रमाणात कमी जास्त बदल करायचा असेल तर त्यात काही गुन्हा नाही, तो त्याने करावा. पण समाजासाठी असलेली आपली जबाबदारी ओळखावी एवढे समजले व त्याप्रमाणे वागले म्हणजे शास्त्रपालन झाले असे समजावे. स्वतःला असे करण्यात किती समाधान मिळेल ते बघा. स्वतःचा स्वभिमान वाढीस लागेल.



राष्ट्र सुधार कार्यात अग्रेसर व्हायचे तर काही सोप्या सहजच करता येण्या सारख्या गोष्टी आहेत.



- आपण एखाद्या गरजु विद्द्यार्थ्याला मदत करु शकता.

- जवळच्या असरकारी संघटनेत काम करु शकता.

- आपण जर वृद्ध असाल तर आजुबाजुच्या लहान मुला मुलींना गोष्टी सांगुन किवा गोष्टी सांगायला लावुन सभाधीट बनवा. तुमचा पण वेळ चांगला जाइल व लहानांना पण जाता जाता वळण लागेल.

- आपण जर गृहिणी असाल तर फावल्या वेळेत तुम्हला येणारी कोठली कला लहानांना शिकवता येईल. कला, गोष्टी, संगीत, गप्पागोष्टीतुन सुद्धा समाजोपयोगी चांगले गुण शिकले, शिकवले जाऊ शकतात.

- तुम्ही जर वैद्द्य किवा डॉक्टर असाल तर जवळच्या गरजु लोकांना सामाजिक स्वास्थ्या बद्दल सांगता येऊ शकेल व औषधेही देऊ शकाल.

- किती लिहु? तुम्ही तुमच्या कुवती प्रमाणे स्वतःच ठरवुन रामाच्या खारुटली प्रमाणे तुमचा वाटा उचलु शकता. थोडक्यात, आयष्यात एकातरी गरजु मुलासाठी देवमाणुस व्हायचा प्रयत्न करा व बघा किती अंतरिक समाधान प्राप्त होते ते.



ज्याना एवढेही जमणार नसेल त्यानी बाकीच्यांनी हाती घेतलेल्या कामात अडथळे न आणता त्यांना मनापासुन निदान चांगले आशिर्वाद तरी द्यावेत. काही गोष्टी ज्या सहज तुमच्या हातुन होऊ शकतात त्यां बद्दल आता लिहीत आहे.



- आपल्याला आवडेले असेल किवा नसेल पण आपले राष्ट्र वेगवेगळ्या भाषिक प्रांतात (राज्यात) विभागले गेले आहे. आ पल्या राष्ट्राने ह्या गोष्टीचा स्वीकार केला आहे. आपले राष्ट्र आपल्या राज्यांपेक्षा श्रेष्ठ असल्या कारणाने अंतरराज्य सिमेवरुन भांडणे उकरुन काढता कामा नयेत व असलेल्या मतभेदांना प्रोत्साहन देता कामा नयेत. कोठच्याही अशा मोहीमेला बळी पडु नका ज्याने राज्या राज्यां मध्ये कलह निर्माण होईल. तुमची उर्मी, तुमची शक्ती व तुमची बुद्धी ही आपल्या राष्ट्राच्या सिमा सुरक्षित कशा राहतील ह्यात लागल्या पाहीजेत. आपल्या सिमेला धरुन असणा-या प्रश्नांशी तुम्ही नेहमी जागरुक असले पाहीजे. कोणत्या सिमा अजुन निश्छित नाहीत, कोणच्या सिमेबाबत कोणच्या राष्ट्रांबरोबर वाद आहेत, घुसखोर कोठुन होत आहे, बांगलादेशी विस्थापितांचा लोंढा अजुन का येत आहे व आपला दश तो थांबवण्यासाठी काय करत आहे ईत्यादी.

- आपण नेहमी सतर्क असले पाहीजे आपल्या राष्ट्राची संपत्ती व नैसर्गीक साठे ह्यांच्या सुरक्षीतते कडे. नेहमी मुलांना व वाटचुकल्या तरुणांना राष्ट्रिय संपत्तीच्यानाषा पासुन परावृत्त केले पाहीजे. अशा कोठच्याही मोहीमेला आपला पाठींबा असता कामा नये कि जेणे करुन राष्ट्रिय संपत्तीला हानी पोहचेल. विरोध दर्शवायच्या सुद्धा चांगल्या पद्धती आहेत त्याचा वापर करावा. कोणत्याही कायद्या विरुद्ध किंवा सरकारी धोरणाचा विरोध करायचा असेल तर राष्ट्रिय संपत्तीला हानी न पोहचवता करा.

- अशा कोणत्याही मोहीमेला प्रोत्साहन व पाठींबा देऊ नका की जेणे करुन मंदीर, मस्जीद इत्यादी धर्मस्थळे दळणवळण केंन्द्रांवर व रस्त्यांमध्ये बांधायचा विचार आहे किंवा बांधली जात आहेत.

- लोकसंख्या वाढीमुळे उद्भवणारे प्रश्न अशिक्षित लोकांना समजावुन सांगा. संख्ये पेक्षा कस का चांगला ह्याचे महत्त्व समजवावे.

- आपल्या राष्ट्राबद्दल चागले विचार मनात नेहमी आणावे, तसेच आपल्या परिवाराबद्दल मनात चांगले विचार आणावे, आपल्या समाजाबद्दल मनात चांगले विचार आणावे. हे सर्वश्रुत आहे की सार्वजनिक प्रार्थनेचा खुप फायदा होतो. मन चांगले होते व आजुबाजुला चांगले वातावरण निर्माण होईला मदत होते. चांगल्या मनाने केलेली प्रार्थना देशासाठी उपायकारक ठरते.

- मतदान हे सगळ्यात मोठे आपले कर्तव्य आहे व लोकशाही टिकवण्याचे मुख्य साधन आहे. ते प्रत्येकाने आपला धर्म आहे अस समजुन पाळले पाहीजे.


(क्रमशः)







राष्ट्रार्पण

1 comment:

M R Anand said...

wow..nice one! very interesting!

Blog Archive